शेतकऱ्यांना वाली कोण आहे का....??
आज बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांचा सण. पिकं घरात आणली की आनंदाने तो साजरा केला जातो. पण, खरेच, शेतकऱ्यांच्या घरात आनंद आहे का?
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेय. कोकणासह राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलाय. कोकणात क्यार चक्रीवादळाने दाणादाण उडवलीय. उभी पिके आडवी झाली आणि कापलेली पिकं भिजलीत. शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला गेलाय. हवं तर प्रत्येकाने घरी विचारावं.
शासकीय सुट्टयांमुळे या नुकसानीचे पंचनामेही अद्याप झालेले नाहीत. मात्र, नुकसानीचा राज्यभरातला आकडा ९ हजार कोटींच्या आसपास आहे.
बहुतांश लोकप्रतिनिधी विजयोत्सवात रममाण झालेत. आपणही त्यात मश्गुल आहोत. काहींनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी सरकारकडे केलीय. पण, शेतकऱ्यांची पोरं म्हणून, सामाजिक जबाबदारी म्हणून आपणही पाठपुरावा करायला हवा. नुसतं 'इडपीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे' असं म्हणून जमणार नाही. तसे ते येत नसते. इथला बळीराजा मोडून पडत असताना त्यांना मदतीचा हात न देता नुसते बळीचे राज्य येवो, असा आशावाद व्यक्त करणं कुचकामी आहे. शेतकऱ्यांच्या स्थितीचे गांभीर्य आपल्याला कळत नसेल तर आपण आपल्या मातीशी नातं तोडलंय, हे पक्के ध्यानात ठेवा. मातीशी नातं विसरून आपल्याला उभंही राहता येत नाही आणि नवी उंचीही गाठता येत नाही. अर्थात इतर लेखनाप्रमाणे हे लेखनही समाजमाध्यमांच्या आभासी जगात विरून जाईल. इतर कोणत्याही पोस्टप्रमाणे ही पोस्ट नजरेआड होईल. पण, त्याने वास्तव लपत नाही. वास्तव भीषण आहे. ते समजून घ्यायचे असेल तर फक्त जरा अंतरात्म्याला विचारा.
-सुनील कांबळी
Comments
Post a Comment